Friday, 27 March 2020

आपलाची (सं)वाद आपणासि..


"यन्त्रारूढानि मायया.." असा यंत्रवत चाललेला समाज हा एकाएकी  रोजची जगण्याची धडपड, आपले Plans, Goals हे सगळ सोडुन एका क्षणात फक्त 'मला जगायच आहे' या एका विचारात कैद झाला. प्रत्येकाची ही जगण्याची धडपड योग्य पण तितकीच केविलवाणी होती. केविलवाणी ती यासाठी की, सद्य परिस्थितीमध्ये माझी भुमिका काय असावी,माझ्या वागणुकीतून बाल-वृध्द, समवयस्कांच्या मनावर काय परिणाम होतो याचा तिळमात्र विचार कोणी करीत नव्हता. प्रत्येक जण आपली भीती समाजमाध्यमांवर विकत होता, हे अजुनही चालुये. एकीकडे भयग्रस्त लोक आणि दुसरीकडे एकत्र येऊन थाळ्या आपटणारे,उद्दामपणे फिरणारे. या दोन Extremes मधे सुवर्णमध्य काढणारे खुप कमी आहेत.भीती वाटणे रास्तच, पण त्यात तारतम्य असण गरजेच आहे. माझा मानसिक दुबळेपणा दुसर्या मध्ये भयगंड निर्माण करत असेल तर ? यास्थितीशी जे डॉक्टर,प्रशासन यंत्रणा आपल्या सर्व शक्तीने झुंझण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या मनात आपल्यासारखी मृत्युची भयानक कल्पना, "माझ कुटुंब" याचा पुसटसा विचार माझ्या वागण्यातून येत असेल तर ? आणि ज्यांच्यासाठी आपण हा लढा देतोय तो समाज उद्दाम, बेफिकीर आहे हा विचार त्यांच्या डोक्यात आला तर? म्हणुन असे वाटते की या आजारापेक्षा ही वृत्ती भयंकर आहे.

तत्वज्ञानामध्ये अनुक्रमिक काळ (Chronological time) आणि मानसिक काळ (Psychological time ) असे दोन प्रकारचे काळ आहेत. त्यात अनुक्रमिक काळाने माणूस मोठा होत जातो. म्हणजेच जगताना असे अनेक कठिण प्रसंग येतात आणि माणसाचे निसर्गाशी (Man vs Nature) असणारे हे द्वंद्व चालुच राहते. म्हणुन सृष्टीसोबत लढणे ही मोठी गोष्ट नाही तर वृत्ती बरोबर लढणे ही गोष्ट मोठी आहे, हे सत्य आहे. माणसाचे विचार, त्याचा विवेक किती विकसीत होत गेला हे मानसिक काळात गणले जाते. आज निसर्गाचे सर्व वैभव माझ्यासमोर आहे,अशा प्रसंगी मी काय स्विकारतो यावरुन मी यशस्वी ठरतो,भोग की भक्ती हा मुळ प्रश्न आहे.

आताच्या काळातील प्रसिध्द लेखक युवाल नोहा हरारी त्याच्या Artificial Inteligence चे फायदे व तोटे या विषयावरील एका भाषणात एक उदाहरण देतो की, समजा दोन लहान मुलांना चेंडू खेळताना भान राहिलं नाही आणि ते अचानक चेंडू मागे धावत रस्त्यावर येतात. समोरुन एक स्वयंचलित गाडी येत असते त्याचा ड्राईवर मागे शांत  झोपलेला असतो. जर गाडी बाजुच्या लेन मधे नेली तर समोरुन येणारा ट्रक धडकेल आणि गाडीच्या मालकाचा मृत्यु होईल. जर गाडी तशीच सरळ नेली तर मुलांचा मृत्यु होईल. तर अशा परिस्थीतीमध्ये या गाडीत कोणता अल्गोरिदम असावा? गाडीच्या मालकाचा जीव वाचेल असा की मुलांचा जीव वाचेल असा ?
तर एलोन मस्क हे आज उद्योग जगतातले प्रसिध्द नाव त्याने त्याच्या संशोधनात याचा विचार केला, त्याने 2015 साली एक मतचाचणी घेतली, निवडक लोकांना त्याने हाच प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारची गाडी बनवावी, जी गाडीच्या मालकाचा जीव वाचवेल अशी की मुलांचा जीव वाचवेल अशी? तर अनेकांनी मुलांना वाचवणारी गाडी बनवावी अशी उत्तर दिली. पण जेव्हा त्याने विचारल की खरच तुम्हाला ही गाडी विकत घ्यायची वेळ आली तर कोणती गाडी घ्याल तर बर्याच जणांचे उत्तर हे मालकाला वाचवणारी गाडी हवी असे होते.

बल्ट्रांड रसेल त्याच्या Impact of Science on Society या पुस्तकात म्हणतो की, We are in the middle of a race between skills as to means and human folly as to ends. मानवी कौशल्यातून उत्कर्षाची साधने निर्माण होतात आणि मानवी मूर्खपणा मानवाला उद्दीष्टांपासून दूर नेतो. रसेलच्या वेळी ही शर्यत मध्यावर होती, आज आपण खुप पुढे आलो आहोत. म्हणुनच विचार-भावना-कृती यांच्यातील हे अंतर दुर करण्यासाठी "समत्वयोग" साधत, अंतीम निकालाचा अट्टाहास न धरता, या शर्यतीमधुन आनंद, उत्साह मिळवण्याचा, जीवन जगण्याचा हेतु स्पष्ट समजण्याचा प्रयत्न करुया.

कॅरल ड्वेक म्हणते त्याप्रमाणे जीवन हे फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्याचा हा सगळा प्रवास आहे. आपण एक उदाहरण घेऊ. महाभारतात, कुरुक्षेत्रावर शूरवीर अर्जुनाने ऐन युद्धाच्या वेळी धनुष्यबाण खाली टाकून, रथामधून खाली उतरून सारथी असलेल्या श्रीकृष्णाला सांगितले की, ‘मी आता लढणार नाही. एक वेळ भीक मागेन, पण द्रोणाचार्य किंवा भीष्माचार्य यांच्यावर बाण चालवणार नाही.’

असे रणात बोलुनि शोकावेगात अर्जुन
धनुष्य-बाण टाकुनि रथी बैसुनि राहिला ll   (गीताई)

‘स्वजनांशी किंवा गुरूंशी लढणे हे पाप आहे’ असा त्याचा
फिक्स्ड माइंडसेट होता आणि तो प्रत्यक्ष श्रीकृष्णालाच पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, तो बदलून ‘अन्यायाविरुद्ध लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे’ अशा ग्रोथ माइंडसेटपर्यंत त्याच्या मनाचा प्रवास झाला.

आपणही यातून बरेच काही शिकू शकतो,आपल्या ही रोजच्या जगण्यात अनेक विषाद  (Psychological Barriers) येत असतात. काही वैयक्तीक स्व-भावातील असतील, काही सामाजिक असतील. अशा अनेक समस्यांवर खुप सार्या तज्ञांनी संशोधन केले आहे, ते खुप रोमांचकारी आणि मजेशीर पण आहेत. त्यांच्या या संशोधनाच्या कथा तुमच्या पर्यंत पोहोचवाव्यात आणि सगळे मिळुन सर्वांच रोजच जगण सहज,सोप आणि आनंदी होण्यास मदत होईल असा प्रामाणिक प्रयत्न करुयात.

टीप -
1) यातील बरेचसे विचार हे संकलीत आहेत. लिहिण्याचा मुळ हेतु हाच की, आपण "सत+चित+आनंदस्वरुप" आहोत याच भान सतत रहावं.

- केदार मुत्तगी


संदर्भ ग्रंथ -
1) भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण "पातन्जल योगदर्शन" - कृष्णाजी केशव कोल्हटकर
2) मनात - अच्युत गोडबोले
3) विषादयोग - आनंद नाडकर्णी
4) मनकल्लोळ - अच्युत गोडबोले, निलांबरी जोशी
5) पांडूरंगशास्त्री आठवले यांचे वाङ्‌मय

No comments:

Post a Comment