Wednesday, 13 September 2017

अति सर्वत्र वर्जयेत्



बुद्धांच्या "करूणे"चा वारसा घेऊन निघालेला म्यानमार देश रोहिंग्यांच्या प्रति इतका निष्ठुर कसा..!!
"दुःख प्यायला दुःखाचीच ओंजळ लागते" हे तत्वज्ञान सांगणारी ओंजळ आज मिटली कशी काय..!!
"सर्वं दुःखं सर्वं क्षणिकं" हे सत्यच.. तर हे रोहिंगे पण क्षणिकच की..
आणि सर्वांना शून्यातच जायचय.. मग हा विरोध का..?

भारतीय हिंदुसुद्धा निर्वासित म्हणून बाकी देशात स्थायिक झालेच की..भुमीहीन इस्राईली ज्यु तर शेकडो वर्षे जगात निर्वासित म्हणूनच राहत होते.. भारतातील इराणहुन आलेले पारसी.. असे अनेक आहेत, पण त्यांना विरोध झाला हे कुठे ऐकिवात तरी नाही..

म्यानमार जगाच्या इतिहासाकडून शिकतोय असे म्हणायचे का..?
यांसाठी त्यांनी निर्वासीतांचा (विशेषतः या विशिष्ठ धर्माच्या) अभ्यास केला का..?
तर उत्तर 'हो' हेच मिळेल..स्वतःमध्ये आणि आपल्या तत्वांच्या परिभाषा यामध्ये काळानुरूप आवश्यक तो बदल केला पाहिजे..'अहिंसा' म्हणजे हिंसा न करणे,दुसऱ्यावर प्रेम करण ही व्याख्या श्रेष्ठच,पण आता "अहिंसा म्हणजे स्वतःची हिंसा होऊ न देणे" ही व्याख्या आत्मसात करणे गरजेचे झाले आहे..
विशेष म्हणजे म्यानमारच्या सध्याच्या state counsellor-  Aung San Suu Kyi यांना तर 'शांततेचा नोबेल' मिळालाय..
"अहिंसा" आणि "करुणा" ही तत्व म्हणून श्रेष्ठच.. याचा आग्रह जीवनात ज्याने-त्याने किती धरावा, हा व्यक्तिगत प्रश्न.. पण हा व्यक्तिगत आग्रह पराकोटीला जातो तेंव्हा तो समाज आणि देशहिताला बाधक ठरतो.कारण व्यक्तीगत आग्रहाने सबंध देशाला सोसावे लागते,हे आमच्या देशाला चांगलेच माहितीये..(ज्यांना वाचावयाचे आहे,त्यांनी गांधींचा 'राजकारणा'च्या अनुशंगाने अभ्यास करावा)

आज पुनः असाच आग्रह होताना दिसतोय, पण आता हा आग्रह एका व्यक्तिचा नसुन पालतु पुरोगामी जमातीचा..
"मानवाधिकार" आणि "मानवतावाद" याअशा अफाट तत्वज्ञानाचा दाखला दिला जातोय.ज्या पुरोगाम्यांना हिंदुत्वाचा तिटकारा आहे,तिच जमात आज 'अतिथी देवो भवः'चा शंख फुंकत फिरतेय.पण याबद्दल ना कुठला मठाधिपती बोलतोय ना कुठला धर्माचा अधिकारी. सगळे आपापली दांभिक भक्ती,पिसाटलेले भक्त,लूटलेली संपत्ती सांभाळण्यात गर्क..असो.

पण आपण तरी या देशाच्या इतिहासाकडून काही शिकू का..? हा प्रश्न आहे..

लखनौ कराराविषयी आचार्य नरहर कुरुंदकर म्हणतात की,
"पुष्कळ जणाना माहित नसणारी गोष्ट ही आहे की,लखनौ-करार बंगालमधील मुसलमानाना कधीच आवडला नाही.मुबईमधील 9-10 % मुसलमानाना विधानसभेच्या 25 % टक्के जागा देणारा लखनौ-करार जिथे मुबई-मद्रासच्या मुसलमानानी लोकसंख्येच्या अडीचपट प्रतिनिधीत्व मिळून समाधानकारक वाटत नव्हता.तिथे बंगाली मुसलमानाना लोकसंख्येइतके प्रतिनिधित्व देणारा करार असमाधानकारक वाटावा यात नवल नव्हते.भारतभर मुसलमानाना विशेष प्रतिनिधित्व देणा-या या लखनौ-कराराचे शिल्पकार स्वत लोकमान्य टिळक होते.आणि करार बंगालसाठी अपुरा आहे,ह्याच्यापुढे गेले पाहिजे,असे प्रामाणिकपणे मानणारे चित्तरंजन दास होते.दासानी बंगालसाठी एक स्वतंत्र करार केला; हा करार 'दास पँक्ट' म्हणून ओळखला जातो.या करारानुसार बंगालमदील 52 % मुसलमानाना 60 %जागा व 55 % नौक-या मिळावयाच्या होत्या.उरलेल्या 40% जागा व 45 % नोक-यात हिन्दूच्या बरोबर इतर सर्व अल्पसंख्यही सामील व्हायचे होते.हा 'दास-करार' देशबंधू दासानी केला,सुभाषबाबू या कराराचे सहभागी होते,दास व मौलाना आझाद या कराराचे आग्रही समर्थक होतेे,ही एक वस्तुस्थिती आपण ध्यानात घेतली पाहिजे....

'दास-करार' काग्रेस श्रेष्ठीना मान्य झाला नाही.त्यानी तो फेटाळून लावला; हे जरी खरे असले तरी त्यामुळे एक गोष्ट सिध्द होते.हिन्दूच्यापासून मुसलमानाना फोडू इच्छिणारी एक तिसरी सत्ता इंग्रजाची ह्या देशात अस्तित्वात आहे; तिला यश मिळू नये म्हणून औदार्याने वागवून,थोडे अधिक देऊन,पडते घेऊन,मुसलमानाचे मन जिंकावे असे सर्वानाच वाटत होते,'औदार्याने जिंका' हा त्या काळातील सर्वाचा मंत्र होता.टिळकाच्यापासून सुभाषबाबुच्यापर्यंत सगळेच औदार्यवादी होते.या औदार्यवादाला गाधी नेहरु अपवाद नव्हते,तसेच दास-सुभाषही अपवाद नव्हते."
(नरहर कुरुदकर,{आकलन} पृ.6-7)

हा आणि असा मुस्लिमांबद्दलचा उदारमतवाद काल ही होता आणि आज ही आहे.. याची अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील..भारतात हिन्दु व्यतिरिक्त धर्मियांचा तलवारीच्या बळाने हिन्दुंनी कुठेही धर्मांतर केल्याचे कोणी पाहिले नसेल,ही हिन्दुंची सहिष्णुता आहे..(या उलट ज्या हिन्दुंना तलवारीच्या धाकाने बाटवले,त्यांना परत हिन्दुंमध्ये घेतले नाही हा मुर्खपणा आम्ही केला)..
बौद्ध,जैन,शिख अशा अनेक धर्मीयांची श्रद्धास्थाने भारतात आजही निर्भयपणे उभी आहेत..पण मुख्य प्रश्न हा आहे, जेव्हा जेव्हा देश आणि धर्म यामध्ये संघर्ष उभा राहतो तेव्हा प्रथम प्राधान्य धर्माला हेच मुस्लिमांमध्ये पाहावयास मिळते..(काही अपवाद वगळता)
"इतिहासात औरंगजेबाने ब्रम्हदेशातल्या बौद्धांवर हल्ला करून त्यांना धडा शिकवला होता. आज अजून एक औरंगजेब जन्मला पाहिजे..
म्यानमार मधील घुसखोर  मुस्लिमांशी भारताने योग्य व्यवहार केले नाहीत तर याचे परिणाम भारताला भोगावे लागतील",अशी भाषा मुलतत्ववाद्यांकडून आज बोलली जात आहे.

१९४७ साली भारताची फाळणी झाली. बरेच हिंदु निर्वासित भुके कंगाल लोक चौदा पंधरा वर्षे भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून याचना करत होते. त्यावेळी एकाही पुरोगाम्याला पान्हा फुटला नव्हता.
काही फालतू (पालतु) पुरोगामी आणि काही मूलतत्ववादी दोन धर्मातील तेढ वाढवतील.भारतातील मुस्लिमांनीही ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे गरजेचे की, हिंदु टिकतील तरच येथील मुस्लिम सुरक्षित राहु शकेल,कारण आज भारतातील मुस्लिम जितका सुरक्षित आहे, तितका तर तो मुस्लिमबहुल देशात ही नाही...

आज देशासमोर आणखी अनेक समस्या आहेत,स्त्रीयांचे संरक्षण, त्यांना मिळणाऱ्या सुविधा..जातीभेद, जात-पंचायती परत डोकी वर काढत आहेत..'आहे रे'आणि 'नाही रे' मधील दरी जास्त खोल होताना दिसत आहे..शिक्षणक्षेत्राचे बारा कधीच वाजलेत..महान संस्कृतीच्या गप्पाष्टके गाणाऱ्या देशात पंतप्रधानाला शौचालयासाठी आग्रह करावा लागतोय,यासारख दुर्दैव कोणत असु शकत नाही..रामराज्याच्या गप्पा मारण आता तरी बंद करुन कामाला लागले पाहिजे,कारण अकर्मण्यता आज वाढत आहेत...वेदकालिन विमानांचा बडेजाव आजही सांगितला जातोय,विमाने असतील ही..पण आज देशाला स्वतःचा लढाऊ विमान बनवणे देखील कठिण झाले आहे आणि हेच वास्तव आहे..प्राथमिक गरजा पुर्ण करण्यात आपण आज ही अपयशी आहोत.. यासर्व समस्यांची अशी गिनती वाढतच जाईल,मग आपलेच प्रश्न सुटत नसताना अजुन डोकेदूखी वाढवुन घेण्यात कोणता पुरुषार्थ आहे..?अतिथींचा आम्ही आज ही सन्मान करतो, पण अतिथी स्वतःचा धर्म लादण्याचा प्रयत्न करत नसतो आणि त्याच निघुन जाण निश्चित असत.. मग हे आले तरी निघुन जाण्याचा विचार तरी करतील का..? या सर्वांचा विचार झाला पाहिजे.

आज इतिहासाच्या योग्य आकलनासोबत वास्तवाच भान हवय..विवेकबुद्धी जागृत ठेवुन योग्यायोग्य ठरवता यायला हवे..
"अति सर्वत्र वर्जयेत्" हे हिन्दू-मुस्लिम दोघांनी लक्षात ठेवणे गरजेचे.
वेदांचा अभ्यास करताना ब्रह्मसुत्रातील चतुःसूत्री हेच सांगते की, जगात परस्पर विरोधी विचार असणारच.. पण शास्त्रांच्या समन्वयानेच ज्ञान/शांतता येणार, विवादाने नाही..

अथातो ब्रह्मजिज्ञासा | जन्माद्यस्य यतः | शास्त्रयोनित्वात् | तत् तु समन्वयात् |

क्रांतिकारकांच्या कुटुंबांनी या स्वातंत्र्य यज्ञात स्वतःची पूर्णाहुती दिलीय, का तर पुढील पिढ्यांच स्वातंत्र्य अबाधीत रहावे.. आज ही अनेक जवान आपल्यासाठी शाहिद होताहेत..अशा अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य 'मिळवले' आहे आणि आता ते टिकवणे आपले कर्तव्य आहे..

माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती |
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती |
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्‌ |
वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ||
(गदिमा)

- केदार मुत्तगी

Saturday, 2 September 2017

नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः



भारताचे झालेले अधःपतन म्हणायचे की...भारतात विचारवंतांचा दुष्काळ पडलाय..?

आज पाश्चिमात्यांमध्ये 'विचारवंता'ची असलेली व्याख्या काय आहे याचा यावरुन अंदाज येऊ शकतो.. (फक्त भारताचीच अशी स्थिती आहे असे नाही)
कारण 'रागा'ला आमंत्रण देणारे Institute of International Studies Berkeley Research on Contemporary India Program and the Institute for South Asia Studies at the University of California (UC).. आणि
विषय- ‘India At 70: Reflections On The Path Forward’.. हा अभ्यासपूर्वक मांडणी करावयाचा विषय,यात राजकारण हा एकच विषय असु शकत नाही.अभ्यासपूर्ण चिकित्सेसह भविष्यात भारत जगाला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शन करु शकतो याचे मत मांडणे आवश्यक असते. मोदी आणि त्यांचे राजकारण हीच एकमेव आज भारतातील समस्या अशी धारणा असलेला माणूस याविषयाव्यतिरिक्त काही बोलणे या बालबुद्धि कडून अपेक्षित ही नाही. या मातीतील अनेक नेत्यांनी, समाजसेवक आदीनी स्वातंत्र्यानंतर भरभरून दिलय, यावर बोलण्याकरता अनेक अभ्यासू आणि तशी कामे करणारे ही भारतात अनेक आहेत.

जीवन का महत्व तभी है जब वह किसी महान ध्येय के लिये समर्पित हो । यह समर्पण ज्ञान और न्याययुक्त हो ।
–इंदिरा गांधी

हे आजीचे वाक्य समजण्या इतकी ही त्याला *** नाही यात शंका नाही.आजकाल 'रागा'सारख्या अनेक विचारवंतांचा आणि भाटांचा सुळसुळाट आहे.पण खरा विचारवंत कोण हे समजण्या इतके आपण सर्व बुद्धिमान आहोत ही अपेक्षा आणि विश्वास ही..

पण 'रागा'चे ऐकून अमेरिका विकसीत स्थितीपासून आणखी किती अधोगामी/उर्ध्वगामी विकसीत होईल हे त्या संस्थेचे तज्ञच जाणो.

जाकी जैसी बुद्धि है , वैसी कहे बनाय ।
उसको बुरा न मानिये , बुद्धि कहाँ से लाय ॥
— रहीम

हे नक्की की, भाटां/पुरोगाम्यांकडून तेही आजी आणि पणजोबाप्रमाणे भारत भाग्यविधाते ठरवले जातील..

भारताचे प्रतिनिधी म्हणुन याच दिवशी म्हणजे 11 सप्टेम्बर 1893 ला "स्वामी विवेकानंदां"नी केलेले भाषण..दोघांच्या चारित्र्य आणि बुद्धिचीकुवत.. परिस्थिती यात जमीन आस्मानाचा फरक..दोघात कसलीच तुलना होवु शकत नाही.
(भाषणाच्या तारखेत असलेले साम्यपाहुन थोडी व्यथा झाली म्हणून लिहीण्याचा प्रपंच..)

विचारवंतांचे हे आजचेे प्रतिनिधीत्व पाहिल्यावर वाटते की, आजच्या तरुण पिढीला 'विवेका'ची अत्यंत गरज आहे. जन्म आणि मरण यामधील अंतर कापताना विवेकाचे वंगण वापरुन आनंदयात्री होणे हेच कदाचित मनुष्य जीवनाचे ध्येय असु शकते.आत्महत्येसारखी पळपुटे मार्ग स्विकारणारा आणि शुल्लक कारणाने निराश होणाऱ्या तरुणाला काय हवे याचा विचार कुणीही करताना दिसत नाहिये. शिक्षणाने आत्मविश्वास - आत्मसन्मान उभा राहायला हवा,पण प्रत्येकाला आज आरक्षणाची कुबडी हवीय. विज्ञानाची कास धरा  अशी परायणे करणारी जमात मानवी मनाचा विचार करताना दिसत नाही आणि बाबा-बुवा च्या नादी लागलेल्या भक्त (उच्चशिक्षितांची संख्या जास्त आहे)मंडळीच्या तोंडी लावायला ही विज्ञान कुठे दिसत नाही. शिक्षणव्यवस्थेकडे विवेक उभी करण्याची जबाबदारी होती,योग्य-अयोग्य यात फरक करता येण्यासाठी निरपेक्ष आणि निःष्पक्ष शिक्षकांची गरज होती आणि आहे, याकडे कुणाचे ही लक्ष नाही.माणुस विकला जातोय याची कुणालाच खंत नाहिये.कुठल्याही धर्मातील मठाधिपतींना काहीही करायचे नाहिये, कारण मुर्खांवरच त्यांची पोट भरत आहेत.सर्व बुद्धिवाद्यांनी आज पुनः शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे,कारण राजकारण हीच एकमेव भारतापुढील समस्या आहे, असा आभास उभा केला गेलाय.

परंतु ज्यांना विधायक कामे करायची आहेत, अशांसाठी बाबा आमटेंसारखी युगपुरुषे आवाहन देतायेत-

माझ्या युवकांनो !
या युगयात्रेत माझ्याबरोबर येण्याची मी तुमच्यावर सक्ती करीत आहे
युद्धातल्या भरतीसाठी नव्हे
तर या विराट अभावाच्या पूर्तीसाठी
आणि तुमच्या-माझ्या अस्तित्वांना अर्थ आणण्यासाठी
मी तेथे येण्याची तुमच्यावर सक्ती करत आहे

जेथे तुमच्या गरजा तुमच्याठायी जन्मण्यापूर्वीच जाणल्या जातील
जेथे तुमच्या अंतरंगात तुम्ही ताठ उभे राहाल
आणि स्वतःच्या आत ताठ उभे राहाल
अभेद्य सेना जेथे तयार होईल
आपल्या आत तुम्ही किती मोठे आहात
हे जेथे मी तुम्हाला दाखवू शकेन
तेथे तुमचे हात जुळतील
तुमची हृदये एक होतील
तुमच्या मस्तकांचे तेथे मिलन होईल
आणि स्वप्नधुंद ज्वालांचे हितगुज तेथे चालेल
अतिथी म्हणून आलेला प्रत्येक आनंदी किरण तेथील रहिवासी होईल
तेथे ‘आज’ च्या भोवती विश्वासाचे  कुंपण असेल
आणि त्यामध्ये प्रिय कर्माची हिरवळ अमाप माजलेली असेल

"आत्मदीपो भवः" हा बुद्धांचा संदेश पुन्हा आत्मसात करायला हवा. सतत प्रश्न विचारणारा सॉक्रेटीस बुद्धित जन्मायला हवा.स्वतःची चुक मान्य करायला प्रामाणिक बुद्धी हवी."सदसद्विवेक", "नित्यानित्यवस्तुविवेक" जागृत करण्यासाठी बुद्धि प्रगल्भ असणे गरजेचे,म्हणून अशी प्रगल्भ बुद्धि बनवण्यासाठी वाचनाची/विचारांची आणि अनुभवाची जोड हवी.

हे दीपा तू जळत रहा ।

असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥

नक्षत्रांशी होते नाते
परि न आता सांगायाचे

भग्‍न चिर्‍यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥
(कुसुमाग्रज)



- केदार मुत्तगी